मुंबईत ५०० मिडी बस धावणार! बेस्टचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
मुंबईत ५०० मिडी बस धावणार! बेस्टचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात
मुंबई - मेट्रो आणि रेल्वे स्थानक परिसरासोबतच गल्ल्यांमधील आणि टेकडीवरील भागांमध्ये प्रवाशांना सुलभ प्रवासाची सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रम ५०० मिडी बस ताफ्यात दाखल करण्याच्या तयारीत आहे. या बस नॉन-एसी आणि सीएनजीवर चालणाऱ्या असणार असून, त्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, बस स्वमालकीच्या घ्याव्यात, अशी जोरदार मागणी सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी केली आहे. या प्रस्तावावर लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. प्रवाशांची वाढती मागणी आणि ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’ लक्षात घेऊन मिडी बसची गरज अधोरेखित करण्यात आली. विशेषतः विक्रोळी, भांडुप, पवईसारख्या टेकडी भागांत तसेच मेट्रो आणि रेल्वे स्थानक परिसरात या बस उपयुक्त ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बेस्ट प्रशासनाने केलेल्या अभ्यासानुसार केवळ मेट्रो आणि रेल्वे स्थानक परिसरासाठीच सुमारे ३१५ मिडी बसची आवश्यकता आहे. पूर्वी २०० बसचा प्रस्ताव होता, मात्र वाढत्या गरजेमुळे तो वाढवून ५०० बससेचा करण्यात आला आहे.
सध्या बेस्टकडे २४९ स्वमालकीच्या बस असून त्यात ३७ ‘तेजस्विनी’ मिडी बस महिलांसाठी राखीव आहेत. याशिवाय ६२५ मिडी बस भाडेतत्त्वावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे नवीन बस स्वमालकीच्या घ्याव्यात आणि शक्यतो वातानुकूलित असाव्यात, अशी सूचना सदस्यांनी केली.
दरम्यान, बस खरेदीसंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. अनुदान मिळवण्याचाही प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. तर पुढील बैठकीत यावर अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी प्रशासनाला दिले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade