विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी
विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी
विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election)महायुतीने मोठा विजय मिळवलाय. महायुतीचे 9 पैकी 9 उमेदवारी विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे. राज्यसभेप्रमाणेच याही निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार करुन दाखवलाय.
ठाकरे-पवारांना मतं फोडण्यात अपयश
विधानपरिषद निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. भाजपचे पाच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे दोन तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही 2 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस उमेदवार प्रज्ञा सातव तर ठाकरेंचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र, निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मतं फोडण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे अजित पवारांचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. शिवाय, शिंदेंच्या शिवसेनेचे मतं फुटलेले नाहीत.
कोणत्या पक्षाचे आणि कोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी -
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
1.) मिलिंद नार्वेकर
काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.
काँग्रेसकडून आमदारांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नाही
विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) पार्श्वभूमीवर आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत, यासाठी प्रत्येक पक्ष काळजी घेत होता. अजित पवारांची राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या पक्षांनी आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नव्हते.
पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन -
विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय अनेक अर्थांनी भाजपसाठी महत्त्वाचा आहे. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या. त्यामुळे त्यांचे समर्थक नाराज होते. लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे मराठवाड्यातील मुंडे समर्थक दुखावले होते. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळाल्याने पंकजा मुंडे यांची महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री झाली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव
Milind Narvekar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीकडील 64 मतांचा विचार केला असता त्यांची पाच मतं फुटली आहेत. मविआसोबत असलेल्या शंकरराव गडाख आणि विनोद निकोले या दोन आमदारांची मतं मोजली असता. मविआकडील एकूण 7 मतं फुटल्याचं समोर आलं आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE