तळोजा औद्योगिक वसाहतीची सुरक्षा ऐरणीवर
आपत्ती व्यवस्थापनाची कमतरता ः तळोजातील कंपन्यांसह अधिकार्यांचे दुर्लक्ष
कळंबोली : प्रदूषणाच्या मुद्द्यावर तळोजा एमआयडीसी अनेकदा चर्चेत आली आहे. आता आपत्ती व्यवस्थापनाचीही कमतरता असल्याची बाब समोर आली आहे. या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. आपत्ती आल्यानंतर त्वरित काय करायचे या विषयी नियोजन नाही. तसेच शीघ्रकृती टीम नसल्याने अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसीची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.
तळोजा परिसरात 907 हेक्टर जागेवर एमआयडीसी वसविण्यात आली. या ठिकाणी 1200 भूखंड असून शेकडो छोट्या-मोठ्या कारखान्यांची नोंद असून, औद्योगिक उलाढालही मोठी आहे. या ठिकाणी लाखो कामगार कार्यरत आहेत. एमआयडीसी परिसरात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या असून अनेकांनी जीव गमावला आहे. कारखान्यातील घातक वायुगळतीमुळे कामगारांसह परिसरातील गावांनाही फटका बसत आहे. अग्निसुरक्षा असो, वायुगळती असो, वा रसायन गळती, अशा घटना हाताळण्यासाठी तळोजा एमआयडीसीकडे आपत्कालीन आराखडा नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपत्ती किंवा अप्रिय घटना घडल्यास नेमके करायचे काय? याचे नियोजनच नाही. एमआयडीसीमध्ये प्रत्येक प्लांटनुसार आराखडा तयार नाही. वायुगळतीसारखा प्रकार घडल्यास, आजूबाजूच्या ग्रामस्थांनी काय करायचे, याविषयी गेल्या अनेक वर्षांत प्रशिक्षण एमआयडीसी व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून देण्यात आले नाही. येथे अग्निशमन दल सोडले तर क्विक रेस्पोंसिबल टीम उपलब्ध नाही. एमआयडीसीकडे तज्ज्ञांचे पथकही नाही. त्याचबरोबर काही कारखान्यांनी नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे. औद्योगिक सुरक्षा नियमावलीचे अनेक कंपन्यांकडून पालन केले जात नाही.
सुरक्षा परीक्षण करण्याकरिता स्वतंत्र टीम नाही. फॅक्टरी इन्स्पेक्टरने परिसरातील कंपन्यांची नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरात वारंवार अपघाताच्या घटना घडत असून, लाखो कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. खरेतर, एमआयडीसीतील प्रत्येक कारखान्यांमध्ये कोणते आणि किती उत्पादन केले जाते. त्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने, वायू, तेल आदी सामग्री आदीची माहिती अग्निशमन दलाला वेळोवेळी देणे गरजेचे आहे; परंतु कंपन्यांकडून तसेच एमआयडीसीतील संबंधित अधिकार्यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. आग लागल्यावर अनेकदा कंपन्यांमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणाही कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya