स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत नुकतेच वाद झाले आहेत. त्यामुळे पक्षाचे नेते रविकांत तुपकर यांना यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांची राजकीय भूमिका सतत बदलत गेल्याने शेतकरी संघटनेचे नुकसान झाल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली आहे. खरे तर राजू शेट्टी हे शेतकरी आंदोलनापासून दूर जात असल्याचे दिसत आहे. त्यांची भूमिका शेतकरी हितासाठी कमी आणि राजकीय जास्त वाटू लागली आहे. रविकांत तुपकरांनी नव्या आघाडीच्या वतीने विधानसभेच्या २५ जागा लढविणार असल्याचेही जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून नुकतीच तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर तुपकर यांनी पुण्यात सहकाऱ्यांची बैठक घेऊन हकालपट्टीच्या निर्णयावर आणि पुढील राजकीय मोर्चेबांधणीवर चर्चा केली. त्यांनी स्वतःची राजकीय आघाडी काढली असून शेतकऱयांची संघटना दुभंगली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हक्कालपट्टी झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी आपले मत मांडले आहे की, माझी काहीही चूक नसताना शेट्टी यांच्या सांगण्यावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्त पालन समितीला ऑगस्ट २०२३ मध्येच मी माझे मत लेखी कळविले होते. त्याचे उत्तर अद्याप मला मिळालेले नाही. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात राजकारण करताना सतत स्वतःच्या सोयीची भूमिका घेतली. कधी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, तर कधी रिडालोस सारखा प्रयोग केला. राजकीय स्वार्थासाठी त्यांनी सतत भूमिका बदलल्यामुळेच शेतकरी संघटनेचे नुकसान झाले आहे. रविकांत तुपकर यांचे मत चुकीचे वाटत नाही. सतत भूमिकेतील बदलामुळे राजकीय पक्ष विभागला जाण्याचा धोका अधिक असतो. राजू शेट्टी यांच्या बाबतीत तेच झाले आहे. राजकारणापायी शेतकरी संघटना फुटत असताना शेतकरी नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे वाटते.
रविकांत तुपकरांनी म्हटले आहे की, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापुरातील तीन तालुक्यांपुरतीच होती. ती संघटना आम्ही राज्यभर नेली. शेट्टी यांनी ऊसदर आंदोलनाच्या बाहेर जाऊन काहीच केले नाही. आम्ही विदर्भ, मराठवाड्यात कापूस, सोयाबीन दरासाठी आंदोलने करीत राहिलो, पण, शेट्टी आमच्या मागे समर्थपणे उभे राहिले नाहीत. आम्ही सतत संघर्ष केला म्हणून आम्हाला जनाधार मिळाला. आमचा वाढता जनाधार त्यांना नकोसा वाटत आहे. चळवळीतील कार्यकर्ता मोठा होऊ नये, असेच त्यांना वाटते. त्यांनी अनेकांची संघटनेतून हकालपट्टी केली. दोन दिवसांपूर्वी माझा नंबर लागला. मला संघटना सोडायची नव्हती, पण मला त्यांनी संघटनेबाहेर काढले आहे, असेही तुपकर म्हणाले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पहिली फूट पडली होती, ज्यावेळी सदाभाऊ खोत हे राजू शेट्टींचे मित्र संघटनेतून बाहेर पडले होते. सदाभाऊ खोत यांनी भाजपाशी जवळीक करत रयत संघटना निर्माण केली. राजू शेट्टी यांनी सदाभाऊंना निवडणुकीला तिकीट दिले. त्या निवडणुकीत खोत हरले. भाजपाचे राज्य सरकार असताना शेतकरी आंदोलन जोरात सुरू होते. अशा वेळी भाजपाला खोतांसारखा शेतकरी नेता आंदोलन मिटविण्यासाठी पाहिजे होता. साहजिकच सदाभाऊंना कृषी राज्यमंत्री पदाची लालूच दाखवत त्यांना मंत्रिमंडळात घेतले. त्यामुळे राजू शेट्टी एकटे पडले. या अनुभवातून ते आता शिकत आहेत, असे म्हणता येईल.
राजू शेट्टी यांनी आत्मचिंतन केले पाहिजे, असे वाटते. कारण पक्षातून हकालपट्टी करण्याचे नक्की ठोस कारण हवे. सदाभाऊ खोत राजू शेट्टीना सोडून गेले आता रविकांत तुपकरही शेट्टींच्या पक्षात नाहीत. दोघांनीही बाहेर जाताच नाविनवपक्षांची उभारणी केली. यामागील नेमके सत्य काय ते पाहिले पाहिजे. शेतकरी संघटना आणि राजकारण हे भिन्न मार्ग आहेत. शेतकऱ्यांचा नेता नक्कीच संसदेत किंवा विधानसभेत गेला पाहिजे. परंतुकसत्तेशी जुळवून घेऊन तात्पुरते प्रश्न सुटतात. पुन्हा अशा काही घटना समोर येतात, त्यावेळी नेता ज्या उद्देशासाठी कार्य करतो, ते कार्य वेगळ्या राजकीय प्रवासात विलीन होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आपली राजकीय पार्टी आणि संघटना यांबाबत दक्ष राहिले पाहिजे असे वाटते. रविकांत तुपकर यांची हकालपट्टी योग्य की अयोग्य हा मुद्दा नाही. परंतु शेतकरी संघटनेतून निर्माण झालेल्या पक्षाची फूट चळवळीसाठी नक्कीच धोकादायक आहे असे वाटते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya