रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न
रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी बैठक पुण्यात संपन्न
पुणे - दलित समाजावरील अन्याय दूर करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या संघर्षात महिलाचा टप्पा ठरलेल्या घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात चवदार तळे आंदोलनाचे शताब्दी वर्षात पदार्पण होत आहे. या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारिणी व प्रमुख नेत्यांची बैठक येथे पार पडली. या बैठकीला राजाभाऊ सरोदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य, अविनाश महातेकर प्रदेश सरचिटणीस, गौतम सोनवणे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य, बाबूराव कदम प्रदेश कार्याध्यक्ष, आशाताई लांडगे राष्ट्रीय सरचिटणीस, बाळसाहेब जानराव, परशुराम वाडेकर, संजय सोनवणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीत प्रामुख्याने चवदार तळे आंदोलन शताब्दी वर्षानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या स्वरूपाबद्दल चर्चा करण्यात आली.
या शताब्दी वर्षानिमित्त राज्यव्यापी समता परिवर्तन यात्रेचे आयोजन केले जाणार असून तिच्या प्रारंभ 14 ऑक्टोबर या धम्मचक्र परिवर्तन दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई यांचे स्मारक असलेल्या सातारा येथून केला जाणार आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून समारोप पुणे येथे दहा नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.
त्याचप्रमाणे राज्यातील प्रत्येक विभागात सामाजिक समता परिषदा आयोजित करून दलित समाजाचा विकास, सवर्ण व दलित यांच्यातील समता यासाठी आवश्यक कार्यक्रमाबाबत परिषदांच्या माध्यमातून विचारमंथन करण्यात येणार आहे. याच उद्देशाने समतावादी विचारवंत आणि साहित्यिक यांच्या संमेलनांचे आयोजनही करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले. सध्याच्या काळात अस्पृश्यता संपुष्टात आली असली तरी जातीभेद नष्ट झालेले नाहीत.अजूनही दलितांवर अत्याचारांच्या घटना घडतच आहेत, हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
त्याचप्रमाणे या वर्षात 15 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यभरात महिला समता परिषदा, आंबेडकरी चळवळीतील शाहीर कलावंतांच्या स्पर्धा, क्रीडा स्पर्धा असे अनेक उपक्रमही राबविण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
आपल्याला तीन वेळा लोकसभा आणि तीन वेळा राज्यसभेत जाऊन समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली. आंबेडकरी विचारांचा प्रचार, प्रसार आणि रिपब्लिकन पक्षाचा देशव्यापी विस्तार यासाठी या संधीचा उपयोग करणार असल्याची ग्वाही देखील आठवले यांनी दिली.
विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या दमनशाहीचा पराभव करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पूर्ण पाठिंबा राहील. या ठिकाणी पक्ष आपला उमेदवार उभा करणार नाही, असे आठवले यांनी स्पष्ट केले. या राज्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सात तारखेपासून दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रिपब्लिकन पक्ष तामिळनाडूमध्ये 40 जागा लढवणार असून आसाममध्ये चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. केरळमध्ये रिपब्लिकन पक्षाचा एक उमेदवार रिंगणात असेल तर पद्दुचेरी येथे सर्व जागांवर भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांना पक्षाचा पाठिंबा असेल, असेही आठवले यांनी सांगितले.
लोकसभेच्या जागांमध्ये वाढ होऊन त्या 816 होणार आहेत. अर्थातच महिलांसाठी राखीव असलेल्या जागांमध्येही 273 पर्यंत वाढ होणार आहे. त्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना वेगळे आरक्षण असणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी 16 तारखेपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आठवले यांनी दिली.
महिलांसाठी आरक्षित असलेल्या राखीव जागांचा लाभ इतर मागास प्रवर्ग व भटके विमुक्त प्रवर्ग यातील महिलांना मिळणार नाही. कारण या प्रवर्गांना अद्याप राजकीय आरक्षण दिले गेलेले नाही. मात्र, अनुसूचित जाती, जमातींप्रमाणेच इतर मागासवर्गीय आणि भटके विमुक्त यांना देखील राजकीय आरक्षण मिळावे, अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असून आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विविध महामंडळांवरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाव्या, अशी मागणी ही आठवले यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेतील एक जागा, प्रत्येक जिल्ह्यात महामंडळाचे किमान एक सदस्यत्व आणि काही महामंडळांवर अध्यक्ष पद देण्याचे आश्वासन दिले आहे. त्याची लवकरात लवकर पूर्तता केली जावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी आपल्या पक्षाची अजूनही अपेक्षा आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही निवडणूक लढण्याचा आग्रह सोडावा व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी त्यांना तशा सूचना द्याव्या, असे आवाहनही आठवले यांनी यावेळी केले. जर निवडणूक झालीच तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. नेत्यांनी काहीतरी पदरात पाडून घेण्याच्या उद्देशाने अशा भोंदू बाबांच्या नादी लागू नये, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार विशेष तपास पथकाकडून काटेकोर चौकशी केली जात असून संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होईल आणि दोषींना कठोरात कठोर शासन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे
भाजपा कडून महापालिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला मोठ्या मनाने उपमहापौरपद मिळाले आहे. त्यानंतर उपमहापौरांना योग्य सन्मान मिळत नसल्याची चर्चा आहे. ही चर्चा अयोग्य आहे. मात्र, रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घ्यावे. सर्व महत्त्वाच्या बैठकांना उपमहापौरांना आमंत्रित केले जावे. वेळ पडली तर यासाठी ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही चर्चा करू, असे आठवले यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade