नसता खटाटोप
नसता खटाटोप
देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबांनीच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र धूम सुरू आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानी सेलिब्रिटींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामध्ये, राजकीय नेते, चित्रपट तारे - तारका आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा तेजस ठाकरेही अंबानीच्या लग्नसोहळ्याला पोहोचले होते. त्यानंतर, तेजस ठाकरे यांचा या लग्नसोहळ्यात डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या नेत्यांनीही हा व्हिडिओ शेअर करत शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांना टार्गेट केले आहे. उद्योगपती किंवा कोणी सेलिब्रिटी असेल तर सर्व राजकारणी मतभेद सोडून त्यांच्या कार्यक्रमाला जातात. पण भाजपाला हे कसे आवडेल. त्यांनी ठाकरे घराण्यावर नेहमीप्रमाणे टीका केली.
आता, भाजपच्या या टीकेला शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तिखट शब्दात उत्तर दिले आहे. भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यावर त्यांची खोचक टीका केली. अंबानींच्या लग्नानिमित्त राजकारण्यांच्या एकमेकांवर लाथाळ्या मारण्याचे फालतू काम सुरू झाले आहे. महाराष्ट्रात कुठल्याही गोष्टीचे भांडवल करून आपली चर्चा काशी करून घ्यायची याची चटक भाजपाच्या काही नेत्यांना लागली आहे, असे म्हणता येईल.
अंबानींच्या लग्नातील डान्स सोहळ्यात तेजस ठाकरे डान्स करताना दिसून आले. त्यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यवांवर व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी टीकेची संधी सोडलीच नाही. जो मराठी तरुण गोविंद रे गोपाळा म्हणत दहिहंडीत नाचताना कधी दिसला नाही. तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींच्या लग्नात शेवटच्या रांगेत उभे राहून नाचताना दिसला, अशी खोचक टीका भाजप आमदार आमदार आशिष शेलार यांनी केली होती. भाजपच्या टीकेला शिवसेना समर्थकांनीही अमृता फडणवीसांचे नाव घेत प्रतिहल्ला केला आहे. आता, सुषमा अंधारे यांनीही ट्विट करुन अमृता फडणविस यांचे नाव घेत आशिष शेलार यांच्यावर तिखट शब्दात खोचक टीका केली.
सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे की, तोरणादारी/मरणादारी वैर मनात ठेवू नये म्हणतात. असो. हे समजायला संस्कार लागतात. ज्याची तुमच्याकडे वानवा आहे.अमृतावहिनी जशा राजकारणात नाहीत, त्यांना वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे तसेच आहे ते, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला आहे. तसेच, तुम्हाला भांडी घासायलाही बोलावले नाही का?, असा सवालही आशिष शेलार यांना टॅग करुन सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या या तिखट, खोचक टीकेमुळे भाजपा-शिवसेनेत आणखी शाब्दीक खडाजंगी होण्याची शक्यता आहे. हे शाब्दिक बिनअर्थाची लढाई शिवसेना - भाजपामध्ये सुरू झाली आहे.
आशिष शेलारांनी एक्स पोस्ट करत तेजस ठाकरेंच्या डान्सवर टीका केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, जो हा भन्नाट नृत्य अविष्कार पाहून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाच्या काळजात धकधक झाले. असो हे नृत्य पण कसे जगविख्यात, गरजेचे आणि जीवनावश्यक..वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे संजयकाका महाराष्ट्राला पटवून देतीलच...! आशिष शेलारांनी खालच्या पातळीवर तेजस ठाकरेंवर टीका करणे योग्य नव्हते. कारण तेजस राजकारणी नाही. परंतु उद्धव ठाकरेंना तेजसच्या आडून चार शब्द सुनावण्यासाठी शेलारांचा हा नसता खटाटोप आहे असे वाटते.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तेजस ठाकरेंवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, अनंत अंबानीच्या लग्नात नाचणाऱ्या तेजस ठाकरेला आता नाच्या ठाकरे नाव द्यावे. यावर आदित्य ठाकरेंनी उत्तर देत म्हटले की, राणेंना सायकॉलॉजी मदतीची खूप गरज आहे. अशाप्रकारे शिवसेना ठाकरे गट आणि भाजपात वाकयुद्ध सुरू झाले आहे. ही लढाई नेहमीच सुरू असते. पूर्वी भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील वादात तोंड घालायचे, आता ते शांत असतात. पण आशिष शेलार वगैरे मंडळी त्यांची जागा चालवतात. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांच्या वाचाळपणामुळे त्यांची जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. दुसऱ्याच्या लग्नात आपण ठळकपणे उठून दिसावे, माध्यमांत चर्चेत यावे यासाठी नसता खटाटोप काही राजकीय नेत्यांचा दिसतो हे राज्याच्या प्रतिष्ठेसाठी नक्कीच योग्य नाही.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
BIPIN ADHANGLE