Breaking News
पालक संघटनांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाडांकडे मागणी
नवी मुंबई : न्यायालयाने पंधरा टक्के शुल्क वसुली बाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. या अनुषंगाने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर शहरातील पालक संघटनांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. फी वसुलीसाठी शिक्षण संस्था मुजोरी दाखवत असल्याने त्रस्त पालकांनी आपली कैफियत शिक्षण मंत्र्यांपुढे मांडली. पालकांच्या सगळ्या तक्रारी राज्य तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द करण्याचे आदेश देऊन तातडीने यावर निर्णय घेण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले आहेत.
नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती, मुंबई पालक समिती, पनवेल पालक संघटना, शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी यासह विविध पालक संघटनांनी शिक्षण क्रीडा मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. पालक संघटनांनी पंधरा टक्के शुल्क कपात सवलतीचा विरोध करत, फक्त शिकवणी शुल्क आकारण्यात यावे या मागणीवर सर्वच पालक संघटनांनी ठाम भूमिका घेतली. पनवेल, मुंबई आणि नवी मुंबईमधील खासगी शिक्षण संस्थांच्या मुजोरीचा पाढाच यावेळी पालकांनी वाचला. फी वसुलीसाठी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढत आहे. वाढीव शुल्क वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. याविरोधात पालकांनी शिक्षण मंत्र्यांना माहिती दिली. या तक्रारींची माहिती घेऊन सबंधित शाळांची माहिती तातडीने तक्रार निवारण समितीकडे पाठवून यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. मंत्री मंडळाच्या बैठकीत शुल्क रचनेबाबत निर्णय घेणार असल्याचेही संकेत त्यांनी दिले.
शिक्षण मंत्र्यांनी शुल्क बाबत दिलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. मंत्रीमंडळ दोन आठवड्या पूर्वी निर्णय घेण्यात आला होता. यावर पुन्हा होणार्या मंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. यावेळी विकास सोरटे, बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, प्रफुल्ल पवार, विवेक सावंत, संदीप भोईटे आदी पालक या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेवून त्यांनाही अडचणी सांगितल्या.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya