Breaking News
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचं नाव देण्यावरून पुन्हा एकदा वाद पेटलेला पाहायला मिळतो. त्यासाठी 9 ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक ऑगस्ट रोजी आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचं नाव द्या अशी भूमिपुत्रांची मागणी आहे पण राज्य सरकार यासाठी तयार नाही. त्यामुळे या आधीही भव्य असे मोर्चे काढण्यात आले होते. गेल्या काही दिवसांआधी यावर मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नसल्याचा इशाराही नामकरण समर्थक समितीतर्फे देण्यात आला होता. 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे नियम पाळून साखळी तयार करून सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. इतके मोठे आंदोलन होऊनही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने कृती समितीने ऑगस्ट क्रांतिदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा मशाल मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारण्यात येणार आहे. यासंदर्भात रुपरेषा, नियोजन आदी विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आमदार महेश बालदी, दशरथ भगत, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya