Breaking News
पंतप्रधानांनी केले जगातील सर्वांत उंच चिनाब आर्च ब्रिजचे उद्घाटन
जम्मू-काश्मीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिनाब नदीवरील जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले, ज्यामुळे काश्मीरला देशाच्या मुख्य रेल्वे नेटवर्कशी जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. या ऐतिहासिक क्षणी त्यांनी तिरंगा फडकावला आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, “लोक फ्रान्समधील आयफेल टॉवर पाहण्यासाठी जातात, आता लोक चिनाब आर्च ब्रिज पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतील. हा पूल स्वतःच एक पर्यटन स्थळ बनेल.” त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसह पूल उभारणीतील कामगारांशी संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले.
चिनाब आर्च ब्रिज – अभियांत्रिकीचा चमत्कार
३५९ मीटर उंचीचा हा पूल एफिल टॉवरपेक्षा ३५ मीटर अधिक उंच आहे. हा भारतातील पहिला केबल-आधारित रेल्वे पूल आहे, जो जम्मू आणि श्रीनगर दरम्यान दळणवळण सुधारण्यास मदत करेल. १,३१५ मीटर लांबीचा हा स्टील आर्च ब्रिज भूकंप आणि हवामानाच्या सर्व परिस्थितींना तोंड देण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
वंदे भारत ट्रेन – वेगवान आणि अत्याधुनिक सुविधा
कटरा ते श्रीनगर प्रवास आता फक्त ३ तासांत पूर्ण होणार, जो पूर्वीपेक्षा २-३ तास कमी आहे. या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायक आसने आणि उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. काश्मीरच्या थंड हवामानानुसार या ट्रेनचे विशेष डिझाइन करण्यात आले आहे, जे प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव देईल.
दरम्यान पंतप्रधान मोदींनी आज ४६,००० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले, ज्यामध्ये उधमपुर-श्रीनगर-बारामुला रेल्वे लिंक (USB-RL) प्रकल्पाचा समावेश आहे. या रेल्वे मार्गावर ३६ बोगदे आणि ९४३ पूल आहेत, जे काश्मीरला देशाच्या मुख्य भागाशी जोडण्यास मदत करतील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
ऋषिकेश तटकरे