पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा युक्रेनचा मैत्रीपूर्ण दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा युक्रेनचा मैत्रीपूर्ण दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच युक्रेनचा दौरा पूर्ण केला आहे. युक्रेनला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे अधिकृत निवासस्थान मारिन्स्की पॅलेस येथे अनेक व्यापक विषयांवर चर्चा झाली. या परदेश भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्यापक विषयांवर चर्चा झाली. पंतप्रधान मोदींनी कीवमधील ओएसिस ऑफ पीस पार्कमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली आणि युद्धात मारल्या गेलेल्या युक्रेनमधील मुलांच्या स्मृती स्थळाला भेट देऊनही श्रद्धांजली वाहिली. या भेटीचा उद्देश युक्रेन आणि भारत यांच्यामध्ये दृढ मैत्रीचे संबंध वृद्धिंगत व्हावेत असा होता. जगात शांतता प्रस्थापित होण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.
मोदींनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे की, माझी युक्रेन भेट ऐतिहासिक होती. भारत-युक्रेन मैत्री अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मी युक्रेनला गेलो. माझी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा झाली. शांतता प्रस्थापित झाली पाहिजे यावर भारताचा विश्वास आहे. मी युक्रेनचे सरकार आणि लोकांच्या आदरातिथ्याबद्दल त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदींच्या या दौर्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. युक्रेन युद्धावर भारताने त्रयस्थ भूमिका घेतल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी फेटाळून लावला आहे. मोदी यांनी हा दावा फेटाळून लावताना म्हटले आहे की , संघर्षाच्या सुरुवातीपासून भारताने कधीही त्रयस्थ भूमिका घेतली नाही. भारत नेहमीच शांततेच्या बाजूने आहे, असे ते म्हणाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाईचा निषेध न केल्याबद्दल भारत सुरुवातीपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांकडून आक्षेप घेत आहे. पाश्चिमात्य देशांनी मॉस्कोवर अनेक निर्बंध लादले आहेत, तर भारताने या दोघांमधील संबंध संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने मॉस्कोशी आपले अनेक दशके जुने धोरणात्मक संबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाच्या मॉस्को येथून भारताला बरेचसे लष्करी उपकरणदेखील पुरवले जाते. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय भूमिका बजावण्याची भारताची इच्छाही मोदींनी व्यक्त केली.
भारत जागतिक शांततेच्या कोणत्याही प्रयत्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्यास तयार आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. शांततेच्या निराकरणाचा मार्ग केवळ संवाद आणि मुत्सद्देगिरीने शोधला जाऊ शकतो आणि वेळ न घालवता त्या दिशेने वाटचाल करायला हवी. या संकटातून मार्ग काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकत्र बसायला हवे, असे पंतप्रधान मोदी यांनी सूचित केले आहे. जुलैमध्ये नुकत्याच झालेल्या रशिया दौऱ्यावर झेलेन्स्की यांच्यासह काहींनी पंतप्रधान मोदींवर टीकाही केली होती. पंतप्रधान मोदींनी काही काळापूर्वी रशिया दौर्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट घेतली होती, अगदी त्याचदिवशी रशियाच्या क्षेपणास्त्रांनी युक्रेनमधील विविध ठिकाणांना लक्ष्य केले होते. या घटनेत कीवच्या रुग्णालयातील मुलांसह अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. झेलेन्स्की यांनी या हल्ल्यावेळी मोदींच्या भेटीचा उल्लेख, शांतता प्रयत्नांना मोठी निराशा, असा केला होता. त्यावेळी रशियन क्षेपणास्त्राने युक्रेनमधील मुलांच्या सर्वात मोठ्या रुग्णालयावर हल्ला केला. तरुण कर्करोगाच्या रुग्णांना लक्ष्य केले. बरेच लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले, असे झेलेन्स्की यांनी त्यावेळी एक्सवर लिहिले होते. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने अशा दिवशी मॉस्कोमध्ये जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारताना पाहणे ही एक मोठी निराशा आणि शांतता प्रयत्नांना एक धक्का आहे, असे झेलेन्स्की यांनी म्हटले होते.
मोदींनी रशियाच्या दौऱ्यावर असताना मुलांच्या रुग्णालयावरील हल्ल्याचा संदर्भ देत निष्पाप मुलांची हत्या हृदयद्रावक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचे म्हटले होते. या विषयावर नुकतीच मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली, असे मोदी पुतिन यांना म्हणाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीदेखील रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्याची भारताची इच्छा दर्शविली. शांततेसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी सर्व भागधारकांमध्ये व्यावहारिक सहभागाची गरज आहे. युक्रेन जागतिक शांतता परिषदेत भारताचा सहभाग कायम ठेवू इच्छित आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. त्यांनी मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील चर्चा अतिशय तपशीलवार आणि अनेक प्रकारे रचनात्मक असल्याचे म्हटले. चर्चा पुढे नेण्याचे प्रभावी मार्ग कोणते असू शकतात, यावरही चर्चा झाल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यातील बहुतांश चर्चा युक्रेनमधील युद्धासंदर्भात होती. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीरपणे म्हटले होते की, हे युद्धाचे युग नाही आणि संवाद व मुत्सद्दीपणा या महत्त्वाच्या गोष्टी आहेत; युद्धातून तोडगा निघणार नाही. मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात भवितव्यात धोरणात्मक भागीदारी वाढवण्याविषयी चर्चा झाली. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. भारत आणि युक्रेनने कृषी, अन्न उद्योग, औषध, संस्कृती आणि मानवतावादी सहाय्य या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी करार केला आहे. व्यापार, आर्थिक समस्या, संरक्षण, औषधनिर्माण, कृषी, शिक्षण या विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे. मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना सोयीस्कर वेळी भारत भेटीचे निमंत्रण दिले आहे.
या भेटीत भारताने युक्रेनला २२ टन किमतीची वैद्यकीय मदत उपकरणे सुपूर्द केली आहेत. भीष्म क्यूब म्हणून ओळखले जाणारे उपकरण, आपत्ती झोनमध्ये जलद तैनातीसाठी डिझाइन केलेले एक अत्याधुनिक मोबाइल रुग्णालय आहे. सर्व आवश्यक औषधे आणि उपकरणे क्यूबिकल बॉक्समध्ये (प्रत्येकी १५ इंच) सुव्यवस्थित पद्धतीने पॅक करून मोबाइल रुग्णालय तयार केले जाते. तसेच युद्ध किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणत्या प्रकारच्या दुखापती व वैद्यकीय समस्या येऊ शकतात, यानुसार त्याची व्यवस्था केली जाते. युक्रेन आणि भारताच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीमुळे व झालेल्या करारांमुळे दोन्ही देशांत मैत्रीचे नवे पर्व सुरू झाले आहे, असे म्हणता येईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
18 DEC TO 24 DEC 2025...
- 24 December, 2025
27 NOV TO 3 DEC 2025 (25)
- 03 December, 2025
ADHARSH SWARAJ 4 SEPT TO...
- 10 September, 2025
ADHARSH SWARAJ 28 AUG TO...
- 03 September, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya