Breaking News
लोह खाणींसाठी गडचिरोलीत होणार लाखो झाडांची कत्तल
गडचिरोली,दि. १० : गडचिरोलीच्या सूरजागड लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या वाढीला पर्यावरण विभागाने मंजुरी दिली आहे. याकरिता खाण परिसरातील ९०० हेक्टर जंगलावरील तब्बल १ लाख झाडे तोडण्याला देखील वन्यजीव संरक्षणाच्या अटीसह परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ९३७ हेक्टर वनजमीन खाणकामासाठी वापरण्यात येणार असून या अंतर्गत येणाऱ्या १.२३ लाख झाडांची कत्तल होणार आहे. त्याचबरोबर या भागातील टायगर कॉरिडोर देखील धोक्यात येईल, असे पर्यावरणवाद्यांचे मत आहे.
दोन महिन्यांपूर्वी लॉयड मेटल्स कंपनीची उत्खनन क्षमता १० दशलक्षवरून २६ दशलक्ष टन इतकी करण्यासाठी पर्यावरण विषयक जन सुनावणी प्रशासनाकडून घेतली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कोळसा विरहित खाण प्रकल्पांवरील तज्ञ मूल्यांकन समितीने (ईएसी) लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडला गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड खाणीतील लोहखनिज उत्पादन अधिक करण्यासाठी पर्यावरणीय मंजुरीची शिफारस केली होती. त्यानंतर काही आठवड्यांतच पर्यावरण मंत्रालयाने या कंपनीच्या अयस्क-वॉशिंग प्लांटसाठी ९०० हेक्टर जंगल परिसरातील लाखाहून अधिक झाडे तोडण्याला परवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, या लोह खाणीतील उत्खनन क्षमतेच्या विस्ताराविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिकांवर सुनावणी सुरु असतानाच ईएसीने खाण विस्ताराला मान्यता दिली. लॉयडस् कंपनीला २००७ मध्ये खाण भाडेपट्टा मिळाला असला तरी खाणकाम २०१६ ला सुरु झाले. मात्र, नक्षलवाद्यांनी विरोध केल्याने ते थांबवावे लागले होते. वन हक्कांच्या मुद्द्यांमुळे आदिवासी समाजाकडून लोहखनिज उत्खननाला अजूनही विरोध सुरु आहे. या प्रकल्पामुळे ३० ते ४० गावांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त लोक विस्थापित होण्याची भीती आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade