Breaking News
गुरांचा बाजार बंद ठेवण्याचे गोसेवा आयोगाचे पत्र मागे , रईस शेख यांच्या मागणीला यश
मुंबई – बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ३ जून ते ८ जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्यासंदर्भात राज्य गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवलेले वादग्रस्त पत्र मागे घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सांगितले.
यासंदर्भात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. सह्याद्री अतिथीगृह येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा सुव्यवस्थे संदर्भात मुख्यमंत्री फडणीस यांनी बैठक घेतली.
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या या बैठकीतही आमदार शेख यांनी ते पत्र मागे घेण्यासंदर्भात आग्रह धरला होता. यासंदर्भात आमदार रईस शेख म्हणाले की, ७ जून रोजी बकरी ईद सण देशभर साजरा होत आहे. राज्यात गोवंश हत्याना कायद्यानुसार बंदी आहे. मात्र गोवंश हत्त्येच्या नावाखाली राज्यातील गुरांचे बाजार बंद करण्याचे २७ मे रोजी पत्राद्वारे बेकायदा आदेश दिले होते. यामुळे ईदच्या कुर्बानीला बकरी मिळणे मुश्किल झाले होते. म्हणून मुस्लिम समाजामध्ये त्या पत्रासंदर्भात नाराजी होती.
आज मुख्यमंत्र्यांच्या लक्षात हे पत्र आणून दिल्यानंतर गोसेवा आयोगाचे पत्र मागे घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गोवंशाच्या नावाखाली काही संघटना बिगर गोवंश जनावरांच्या वाहतुकीला अडथळे आणतात, हप्ते घेतात, वाहन चालकांना मारहाण करतात. अशी बेकायदेशीर कामे करणाऱ्या घटकांचा बंदोबस्त करावा, अशी विनंती आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली.
मुंबईतील देवनार कत्तलखान्यातील कत्तलचे वाढवलेले शुल्क वर्षभरासाठी २० रुपये करण्यात यावे. देवनार कत्तलखान्याचे आधुनिकीकरण करावे आणि मुंबईत मांस मार्केट हे पूर्व, पश्चिम आणि उपनगर असे विकेंद्रीत पद्धतीने करण्यात यावे, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्याचे आमदार रईस शेख यांनी बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade