Breaking News
मराठी लिहिता- वाचता येत असेल तरच मिळणार रिक्षाचा परवाना
नाशिक - नाशिकमध्ये आता रिक्षा चालवण्यासाठी फक्त वाहनचालक परवाना असून चालणार नाही, तर उमेदवाराला मराठी भाषा लिहिता-वाचता येणंही आवश्यक आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) अलीकडेच हा नवा नियम लागू केला असून, यामुळे अनेक रिक्षाचालक अडचणीत आले आहेत. मराठी भाषेची परीक्षा पास होणं बंधनकारक केल्यामुळे गेल्या आठवड्यात तब्बल 145 अर्जदार अपात्र ठरले आहेत. अनेक रिक्षाचालक बोलणारी मराठी उत्तम जाणतात, मात्र शाळेतील शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना लिहिणं किंवा वाचणं अवघड जातं. परिणामी ते या चाचणीत नापास होतात आणि परवान्यापासून वंचित राहतात. या निर्णयावर रिक्षाचालक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मराठी भाषेची ही परीक्षा कोणत्याही गुणांच्या आधारावर नाही, परंतु उमेदवाराला मराठी लिहिता वाचता येते की नाही, याची चाचणी घेतली जाते. या निर्णयामुळे दररोज 15 ते २20 रिक्षाचालकांचे अर्ज नाकारले जात आहेत. नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक मराठी बोलू शकतात, मात्र त्यांना वाचता आणि लिहिता येत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी अशा भाषिक अटी नव्हत्या, त्यामुळे ही नवी अट अचानक आल्याने रिक्षाचालकांमध्ये नाराजी पसरली आहे.नाशिक आरटीओच्या या नव्या अटीवर रिक्षाचालक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant