Breaking News
वृत प्रतिनिधी-सूनील सावंत
सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा काळाचौकीचा महागणपती.
काळाचौकीतील दत्ताराम लाड मार्गावरील मराठमोळ्या वसाहतीत सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य तत्परता जपणारे हे मंडळ या वर्षी ६७ वा महागणपती उत्सव साजरा करणार आहे.
लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली होती ती भावना तेच उद्दिष्ट मंडळाच्या प्रवासात प्रकर्षाने जाणवत आहे.
रौप्य, सुवर्ण, हिरक अशी यशस्वी मजल दरमजल करत आता हे मंडळ अमृत महोत्सवा कडे मार्गस्थ होत असून अमृताची गोडी चाखण्यास आतुर झालेले आहे.
कला,क्रिडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मंडळाच्या वतीने गेली ६६ वर्षे दैदिप्यमान असे कार्य मंडळ करत आहे.
तिथीनुसार शिवजयंती उत्सव देखील मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. याच शिवजयंती उत्सव काळात शिवकालीन देखावे आणि शिवप्रभूंचा इतिहास मिरवणूकीतून प्रसारित होत असतो.
श्री महागणपती उत्सव काळात सामाजिक देखावे पाहण्यासाठी केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक देखावा पहाण्यासाठी येतात. हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे.
विभागातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाच्या वतीने वर्षभराच्या काळात विविध स्पर्धांचे तसेच प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. या स्पर्धांमध्ये चित्रकला,निबंध, वक्तृत्व, एकांकिका नाटक, फोटोग्राफी, शाॅर्ट फिल्मस, शरीर सौष्ठव स्पर्धा आणि वैज्ञानिक प्रयोग वैगरे अशा वैविध्य व नाविन्यपूर्ण स्पर्धांचा समावेश आहे.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंसाठी विशेष निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्न करत असते.
प्रत्येक उत्सवाच्या तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विभागातील असंख्य संस्था एकत्रीत येऊन आपली सांघीक शक्ती दाखवून प्रत्येक उत्सव आणि विधायक उपक्रम यशस्वी करून दाखवत असतात.
मागील २ वर्षांच्या कोरोना विषाणू संसर्गजन्य विकाराच्या काळात मंडळाने जबाबदारीने संपूर्ण विभागात धुम्रफवारणीचा विधायक उपक्रम यशस्वी केला.
तसेच कोरोना रूग्णांना तातडीने रक्त मिळावे यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करून ४६७ रक्तदात्यां करवी कर्तव्याची पुर्तता देखील केली.
याही पुढे यथाशक्ती सहकार्य म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस मंडळाच्या वतीने भरीव आर्थिक सहकार्य करण्यात आले होते.
तसेच सन २०१९ साली महाराष्ट्रातील सांगली आणि कोकणात जेव्हा पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा सांगली येथील ४ ते ५ गावांना अत्यावश्यक साधन सामग्रीचा यामध्ये ( भांडी,कपडे, औषधे,अन्नधान्य वैगरेचा) लक्षावधी रूपयांचा पुरवठा मंडळाच्या वतीने करण्यात आला होता.
ओंजळीत जमा झालेले जेवढे संचित आहे ते ते समाजासाठी समर्पित करण्याची दाता वृत्ती मंडळाच्या ठायी ठायी जाणवत आहे.
श्री महागणपती कृपादृष्टी आणि आशिर्वादाने मंडळाची प्रगतीपथावरील वाटचाल ही ऐक्याची, सांघिक शक्तीची आणि अध्यात्मिक भक्तीची अशीच आहे. याच भक्तीपुर्ण प्रवासातुन मंडळाने "हिरक महोत्सवी" काळापासून सतत ७ वर्षे श्री महागणपतीचा पारंपारिक आगमन सोहळा यशस्वी करत आहेत. या पारंपारिक आगमन सोहळ्यात महाराष्ट्राच्या विविध जाती पंथाची संस्कृती त्यांची परंपरागत असणारी नृत्ये, पालखी, कवायतीचे प्रकार, ढोल ताशे,वाघ्या मुरळी, कोळी नृत्य, मंगळागौर, वारकरी, बाल्या नृत्य वैगरे अशा नाविन्यपूर्णतेचा अविष्कार आगमण सोहळ्यात गेली ७ वर्षे पहायला मिळत आहे.
महागणपतीचा उत्सव हा केवळ सामाजिक उत्सव नसून तो माझ्या घरातीलच उत्सव आहे या भावनेने आणि जाणीवेने प्रत्येक नागरिक तन,मन,धन अर्पण करून सेवा देत असल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे.
"इवलेसे रोप लावियले दारी आणि त्याचा वेलू जातोय गगणावरी" हीच प्रचीती मंडळाच्या बाबतीत दिसून येत आहे.
या मंडळात ५ विश्वस्त यामध्ये रवी चव्हाण, प्रकाश राणे, रवी बने, नितीन केरकर, राजन पार्टे अध्यक्ष अमरदिप गोसावी, प्रमुख कार्यवाहक अनिल जाधव, खजिनदार अमीत पार्टे
आणि कार्यकारिणी तसेच सहकार्यकारिणी असे उत्कृष्ट पदाधिकारी मंडळ या वर्षी कार्यरत आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant