Breaking News
नवी मुंबई ः कोकणातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे उसळलेल्या जलप्रलयाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसलेला असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानानुसार विविध पातळ्यांवरून मदतीचा हात पुढे केला जात आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेचे 43 जणांचे मदतकार्य पथक तातडीने आज सकाळी 7 वाजता महाडच्या दिशेने रवाना झाले आहे.
एक बस, 2 जीप आणि आवश्यक साधनसामुग्रीसह 43 जणांच्या या पथकास महाडकडे रवाना होताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात कोव्हीड अनुरूप वर्तनाचे पालन करून सक्रीय मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्याठिकाणी माणगावच्या प्रांत प्रशांती दिघागावकर यांच्या नियंत्रणाखाली हे पथक आवश्यक ते मदतकार्य करणार असून त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात टिकाव, फावडे, घमेली, कुदळ, पहार, काटा फावडे, कचरा भरण्यासाठी मोकळ्या गोणी, मास्क, हॅन्डग्लोव्ह्ज, गमबूट असे आवश्यक साहित्य तसेच कार्बोलिक पावडर, ब्लिचींग पावडर अशी जंतुनाशके आणि कोव्हीड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने सोडियम हायपोक्लोराईड व स्प्रेईंग पम्पस देण्यात आलेले आहेत.
सन 2018 मध्येही जलप्रलयाच्या काळात कोल्हापूर भागात नवी मुंबई महानगरपालिकेच्या मदतकार्य पथकाने समर्पित भावनेने काम केले होते व त्याची दखल विविध पातळ्यांवर घेण्यात आली होती. महाडकडे रवाना झालेल्या या पथकामध्ये उपमुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे यांचेसह स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील व विजय नाईक तसेच 40 स्वयंसेवक मदतकार्य करणार आहेत.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya