मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

बसपाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात

बसपाचा राष्ट्रीय दर्जा धोक्यात 

           एकेकाळी उत्तर प्रदेश राज्यात सत्तेवर असणारा आणि राष्ट्रीय राजकारणातील उदयोन्मुख पक्ष म्हणून पाहिल्या गेलेल्या बसपा पक्षाची अवस्थ दयनीय झाली आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाला एकही जागा जिंकता आलेली नसल्यामुळे या पक्षाची राष्ट्रीय प्रतिमा धोक्यात आल्याचे दिसत आहे. या पक्षाचा दर्जा गमावला जाण्याची शक्यता अधिक दिसते. एप्रिल १९८४ साली कांशीराम यांनी या पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यानंतर मायावती यांनी या पक्षाचा ताबा घेतला. 

बहुजन समाज पार्टी (बसपा) हा सध्या तरी राष्ट्रीय पक्ष आहे.

                   २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाने संपूर्ण देशभरात उमेदवार उभे केले होते. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये असे दिसून आले की, देशात या पक्षाचा मतटक्का २.०४ टक्क्यांवर घसरला आहे. बसपा हा दलितांचे प्रतिनिधित्व करणारा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. मात्र, निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीनंतर घेतलेल्या आढाव्यानंतर बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाईल अशी शक्यता आहे. १९९७ साली बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाला होता. पक्षाच्या स्थापनेपासूनच बसपाचा जनाधार आणि मतटक्का वाढला. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर दलितांचा हक्काचा राजकीय पक्ष म्हणून या पक्षाकडे पाहिले जात होते. परंतु, उत्तर प्रदेशमधील २०१२ च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर या पक्षाला उतरती कळा लागली. सध्या देशामध्ये सहा पक्षांना राष्ट्रीय पक्षांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामध्ये भाजपा, बसपा, काँग्रेस, आप, राष्ट्रीय पीपल्स पार्टी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या पक्षांचा समावेश आहे

                 सुमारे २७ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला बसपा आजमितीस राष्ट्रीय दर्जा गमावण्याच्या स्थितीत आहे. देशातील मागासवर्गीय समाजाने या पक्षाला जनाधार मिळवून दिला. निवडणूक चिन्हे आदेश (आरक्षण आणि वाटप), १९६८ नुसार राष्ट्रीय पक्षाला लोकसभा निवडणुकीमध्ये चार अथवा त्याहून अधिक राज्यांमध्ये किमान सहा टक्के मते मिळणे आणि चार सदस्यांची निवड होणे गरजेचे असते. किंवा पक्षाने लोकसभेमध्ये किमान तीन राज्यांमधून दोन टक्के जागा जिंकणे आवश्यक असते. राजकीय पक्षाला भारतभरातील किमान चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळायला हवी, हाही एक पर्याय उपलब्ध आहे. यापैकी कोणताही निकष पूर्ण केल्यास पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त होतो. परंतु विशेष म्हणजे, १८ व्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाला एकही जागा जिंकता आलेली नाही; तसेच मतटक्का २.०४ टक्के आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी असलेले पहिले दोन निकष बसपाला पूर्ण करता आलेले नाहीत. २०२४ च्या निवडणुकीचे अंतिम निकाल आणि आकडेवारी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अजून प्रकाशित जहालेली नाही. तिसऱ्या निकषानुसार पक्षाला किमान चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळणे गरजेचे आहे. मात्र, बसपा हा निकष पूर्ण करण्यास असमर्थ आहे. बसपाने आत्तापर्यंत काही काळ फक्त उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ही कामगिरीदेखील नंतर खालावली. २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये या पक्षाला १२.८८ टक्के मते मिळाली होती.

                  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बसपाला ९.३९ टक्के मते मिळाली. त्यामुळे प्रादेशिक पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेला आठ टक्के मतटक्क्यांचा निकष पक्षाने पूर्ण केला. मात्र, या आकडेवारीनुसार हा पक्ष फक्त उत्तर प्रदेशमध्येच प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यताप्राप्त ठरू शकतो. निवडणूक चिन्हे आदेश (आरक्षण आणि वाटप), १९६८ नुसार, पक्षाला प्रादेशिक पक्षाचा दर्जाचा मिळण्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये सहा टक्के मते, तसेच किमान दोन आमदार निवडून येणे गरजेचे असते. किंवा पक्षाने शेवटच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सहा टक्के मते मिळविणे आणि राज्यातील एका जागेवर विजय मिळविणे गरजेचे असते. तसेच आणखी एक पर्यायी निकष म्हणजे पक्षाने विधानसभेच्या एकूण जागांपैकी किमान तीन जागा किंवा तीन टक्के जागा यापैकी कोणती संख्या अधिक असेल, तेवढ्या जागा जिंकणे गरजेचे असते. लोकसभेत त्या राज्यातील प्रत्येकी २५ जागांमागे किमान एक खासदार निवडून आला असेल तर पक्ष प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यास पात्र ठरू शकतो. तसेच, शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा त्या विशिष्ट राज्यातील विधानसभा निवडणुकीत एकूण वैध मतांपैकी किमान आठ टक्के मते मिळालेली असावीत, असाही एक निकष आहे.

                 निवडणूक आयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतरचा आढावा लवकरच घेईल. मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये बसपाची कामगिरी सातत्याने घटताना दिसत आहे. २००९ मध्ये या पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये २१ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांचा मतटक्का ६.१७ टक्के होता. मात्र, २०१४ साली या पक्षाचा मतटक्का ४.१९ टक्क्यांवर घसरला आणि पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बसपाने सपाबरोबर युती केली होती. त्यांना ३.६६ टक्के मते मिळाली आणि १० जागाही प्राप्त करता आल्या. बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर अशीच शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी पक्षाचा एकही सदस्य लोकसभेत नव्हता; तसेच मतटक्का ४.१९ टक्के होता. त्या वेळीच बसपाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला असता. मात्र, निवडणूक आयोगाने २०१६ साली केलेल्या सुधारणांमुळे असे घडले नाही.

                  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर २०१६ साली निवडणूक चिन्हे आदेशामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्या १ जानेवारी २०१४ पासूनच लागू करण्यात आल्या. त्या सुधारणांनुसार १० वर्षांनंतर राजकीय पक्षाच्या दर्जाबाबतचा आढावा घेतला जाणार होता. हा नियम सगळ्याच पक्षांना लागू करण्यात आला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर याबाबतचा आढावा घेण्यात आला. मात्र, बसपाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकवून ठेवता आला. कारण- चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून असलेली आपली पात्रता टिकवता आली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाने केलेल्या खराब कामगिरीबद्दल, तसेच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाण्याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतो. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाचे काही नियम आहेत.यातील कसोटीवर बसपाचा राष्ट्रीय दर्जा व प्रादेशिक दर्जा यांचे परीक्षण होऊ शकते. निवडणूक आयोगाकडून आढावा घेण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू शकते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर आढावा घेतल्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये आम आदमी पार्टीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. तसेच भारतीय कम्युनिस्ट पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तृणमूल काँग्रेस पार्टीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास पक्षाला काही फायदे मिळतात. संपूर्ण देशभरात एकाच विशिष्ट चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी पक्ष वाढवण्यावर भर दिला नाही, असे म्हणता येईल. बसपा पक्षाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी पक्षप्रमुखानी रचनाबद्ध कार्य करण्याची गरज आहे असे वाटते.

रिपोर्टर

  • BIPIN ADHANGLE
    BIPIN ADHANGLE

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    BIPIN ADHANGLE

संबंधित पोस्ट