Breaking News
सर्वसामान्यांना वीज दरात तब्बल 10 टक्के कपात, तर पाच वर्षात 26 टक्क्यांनी वीजदर कमी होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Maharashtra Electricity Rates Drop: राज्यातील वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीज दर कपातीच्या संदर्भात एक्स पोस्ट केली आहे. आपल्या एक्स पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, "साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीज दरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला. या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील."
आपल्या पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं, "आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे."
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Rejendra Salaskar