Breaking News
पासपोर्टसाठी आता ‘ही’ कागदपत्रे अनिवार्य
मुंबई -‘पासपोर्ट नियम, १९८०’ या नियमावलीत केंद्र सरकारने बदल केले आहेत. या आठवड्यात बदल करण्यात आले असून नवीन नियम अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर लागू होणार आहेत. पासपोर्टसाठी अर्ज करणे, मजकुरात बदल करणे, अशी कामे पासपोर्ट सेवा केंद्राद्वारे केली जातात. आता ही केंद्रे वाढवली जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत सेवा केंद्रांची संख्या ४४२ वरून ६०० केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या सुधारित नियमांनुसार आता १ ऑक्टोबर २०२३ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींना पासपोर्टसाठी अर्ज करताना जन्मदाखला देणे अनिवार्य करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, महानगरपालिका किंवा जन्म-मृत्यू नोंदणी कायदा, १९६९ अंतर्गत कोणत्याही तत्सम प्राधिकरणाकडूनच जन्म दाखला वितरीत केलेला असावा. विशेष म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ पूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना हा नियम लागू होत नाही. ते पूर्वीप्रमाणेच एसएससी बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना किंवा इतर तत्सम सरकारी ओळखपत्राचा पुरावा सादर करू शकतात.
आजमितीपर्यंत पासपोर्टच्या शेवटच्या पानावर पासपोर्टधारकाचा कायमचा पत्ता छापलेला असायचा. पण यापुढे शेवटच्या पानावर पत्ता छापला जाणार नाही. त्याऐवजी तिथे बारकोड छापला जाईल. इमिग्रेशन अधिकारी हा बारकोड स्कॅन करून पत्त्याबाबत माहिती मिळवू शकतील.
यापुढे पासपोर्टचे कव्हर वेगवेगळ्या रंगाचे असेल. जेणेकरून त्याचे वर्गीकरण करणे सोपे जाईल. सरकारी अधिकाऱ्यांना पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट दिला जाईल. तसेच मुत्सद्दी अधिकाऱ्यांना लाल रंगाचा पासपोर्ट दिला जाईल. दरम्यान, सामान्य नागरिकांना पूर्वीप्रमाणेच निळ्या रंगातला पासपोर्ट मिळेल.
पासपोर्टच्या शेवटच्या पानावर छापले जाणारे पालकांचे नाव यापुढे छापले जाणार नाही. या बदलामुळे एकल पालक किंवा विभक्त कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. त्यांना माहितीबाबत गोपनीयता राखता येणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर