Breaking News
वांद्रे ते वरळी प्रवास आता अवघ्या बारा मिनिटात
मुंबई - मरीन ड्राईव्ह ते वांद्रे आता फक्त 12 मिनिटांत! मुंबई कोस्टल रोडचा मोठा टप्पा लवकरच सर्वांसाठी खुला झाला आहे. या नवीन मार्गामुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होईल आणि वाहतूक कोंडीचा त्रासही कमी होईल. मुंबईकरांना मिळणारा हा नवा रस्ता, शहराच्या गतिमान जीवनशैलीत नवा अध्याय निर्माण करेल!
मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा कोस्टल रोड तीन-चार टप्यात सुरु करून आज सीलिंकला जोडण्याचे महत्वपूर्ण काम झाले आहे.
मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास आता केवळ १० मिनिटात पूर्ण होणार आहे. हा प्रवास सुखकर, जलद होणार असून यातून इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि वेळ वाचणार आहे. तसेच वर्सोवा ते विरार असा हा प्रकल्प आम्ही पुढे नेत आहोत. मरीन ड्राईव्ह ते वर्सोवा हे अंतर केवळ ४० मिनिटात पूर्ण होणार आहे. पुढे पालघर पर्यंत हा प्रकल्प नेण्यात येणार आहे. वाढवण हे जे सर्वात मोठे बंदर होणार आहे, त्यासाठी सुद्धा या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर हे प्रकल्प पूर्णत्वास गेले असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकल्पाबद्दल पूर्ण समाधान आहे. आपण मुख्यमंत्री असताना दिल्लीतून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणल्या होत्या. आधीचे मुख्यमंत्री दिल्लीला जायचे आणि हात हलवत परत यायचे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला सुरुवात झाली. यामध्ये कोळी बांधवांचा प्रश्नही मार्गी लावण्यात आला आहे. दुसरा टप्पा सुद्धा लवकरच सुरु होईल. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी एकाच मोटारीतून या मार्गावरून प्रवास केला. मोटारीचे सारथ्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade