Breaking News
सिंधू पाणी करारावरून पाकला अजून एक झटका
नवी दिल्ली - सिंधू पाणी करारावरून जागतिक बँकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. आम्ही भारताला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडू शकत नाही, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी म्हटले आहे. तसेच द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये मध्यस्थाव्यतिरिक्त संस्थेची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बंगा म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील आहे आणि जर ते असहमत असतील तर जागतिक बँकेची भूमिका फक्त वाद सोडवण्यासाठी तटस्थ तज्ञ किंवा मध्यस्थीची व्यवस्था करणे आहे. ही आमची भूमिका आहे.
अजय बंगा यांनी ‘सीएनबीसी-टीव्ही १८’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘करार स्थगित करण्यात आलेला नाही. भारत सरकारने याला ‘सध्यापुरती स्थगिती’ असे म्हटले आहे. सिंधू जल करारात तो निलंबित करण्याची कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे हा करार एकतर रद्द करावा लागेल किंवा त्याऐवजी नवीन करार करावा लागेल. हे दोन्ही देश तयार झाले तरच शक्य आहे. वर्ल्ड बँक केवळ मदत करू शकते, परंतु कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानलाच या कराराबाबत निर्णय घ्यावा लागेल.’
सिंधू जल करार (IWT) भारत आणि पाकिस्तानमध्ये १९६० मध्ये झाला होता. या कराराचा उद्देश सिंधू नदीच्या पाण्याचे वाटप करणे हा होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर