Breaking News
राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागणार CET
मुंबई - राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या एका सत्रात गणित विषयातील प्रश्नांमध्ये गोंधळ झाल्याची कबुली सीईटी कक्षाने दिली आहे. आता या सत्रातील २४ हजार ७४४ विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा इंग्रजी, मराठी आणि उर्दू या तीन भाषांमध्ये होते. त्यातील मराठी भाषेतील पेपर इंग्रजीत भाषांतरित करताना प्रश्नांच्या पर्यायांची अदलाबदल झाल्याचे स्पष्टीकरण कक्षाने दिले. संबंधित विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, यासाठी त्यांची पुन्हा परीक्षा घेतली जाईल, असे कक्षाने सांगितले.
अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दर वर्षी पीसीएम आणि पीसीबी या दोन गटांमध्ये एमएचटी सीईटी परीक्षा होते. यातील पीसीएम गटाच्या परीक्षेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच २७ एप्रिल रोजी झालेल्या एका सत्रातील गणिताच्या पेपरमधील ५० पैकी २१ प्रश्नांसाठी दिलेल्या उत्तरांचे पर्याय चुकीचे होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता, त्यात तांत्रिक चूक असल्याचे निदर्शनास आले, असे सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant